वरूड- आज तरुणांना फक्त दारू, सिगारेट, गुटखा याचेच व्यसन नाही तर आता नवीन व्यसन तरुणांना जडले आहे मोबाईलचे. दीड जीबी नेट तरुणांचे आयुष्य खराब करत आहे. अनेकांना झोपताना, उठल्यावर, काम करताना, जेवताना सतत मोबाईल जवळ बाळगण्याची सवय जडली आहे. पण, काहीकाळ मोबाईलपासून दूर राहणं शरीर व मनासाठी खूप गरजेचे आहे. मोबाईल फक्त गरजेची गोष्ट राहिली नसून अनेकांचे व्यसन झाले आहे. घरा घरात आज मुलांचा आणि पालकांचा संवाद संपला आहे. या जीवघेण्या व्यसनांच्या आहारी पूर्ण देशातली तरुण पिढी गेलेली आहे. या दीड जीबी नेट वर आपली मुले काय पाहतात काय नाही मोठ्यांनी म्हणुन मुलांवर लक्ष ठेवा. मोबाईल वापरु नका अस माझे म्हणने नाही मोबाईल जरूर वापरला पाहिजे पण तो कुठे आणि कसा वापरावा हे महत्वाचे आहे. म्हणुन दीड जीबी नेट अन तरुणाई झाली सेट या आपल्या गीतातून प्रबोधनकार इंजि. पवन महाराज दवंडे यांनी तरुणांना आणि पालकांना संदेश दिला. नवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील सती माता मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित विशेष कीर्तनात ते बोलत होते. तुमचे सर्व व्यसने माझ्या खंजिरी मध्ये टाका आणि चांगल्या संगतीचे व्यसन करा यासाठी दीड जीबी नेट सोडून साधू संत महापुरुषांच्या विचारांच आयुष्यभर न संपणार रिचार्ज करा आणि आपले जिवन सुंदर करा असा सल्ला दिला. यावेळी कीर्तनाला प्रमुख पाहुणे शहरातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. मनोहर आंडे, युवा व्यापारी लोकेश भाऊ अग्रवाल, प्रा. नितीन ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाला साथसंगत म्हणुन हार्मोनियम वादक सतीश इंगोले, तबलावादक विलास पिंपळकर, सहायक वैभव वानखडे, कृष्णा पिंपळकर आणि त्र्यंबक सहातपुरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेणे झाली.