भाजप आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल
मुंबई-: देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी काल इस्राइली दहशतवाद्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्यावर आदरणीय शरद पवारनी टीका केली. आश्चर्य असं वाटतं की ज्या पवार साहेबांना १९९२ दंगलीच्या काळात जेव्हा बॉम्बब्लास्ट झाले आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं होतं तेव्हा दहशतवादी देशाची कशी वाट लावू शकतात हे त्यांनी स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. तरीही केवळ मतांच्या राजकारणासाठी ते आमच्या पंतप्रधानांवर टीका करत होते, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.
पुढे नितेश राणे म्हणाले, इंडिया अलायन्सच्या कोणालाही आम्ही कुठेही हमासचा निषेध करताना ऐकलेलं नाही. दहशतवाद्यांविरोधात बोलताना आम्ही ऐकलं नाही. म्हणजे मतांच्या राजकारणासाठी किती लाचार व्हायचं याला काही मर्यादा राहिलेली नाही. देशामध्ये जे जिहादी विचारांचे लोक आहेत, ते हमासचं समर्थन करतात आणि इंडिया अलायन्सचे लोक त्यांना पाठिंबा देतात. मी तर असं ऐकलं की तो ओवेसी कार्टा त्यांच्या समर्थनार्थ रॅली काढणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे देखील ओवेसींच्या खांद्याला खांदा लावून त्या रॅलीत उद्या दिसले तर आश्चर्य वाटायला नको.
आज सकाळी संजय राजाराम राऊत भांडुपमध्ये बसून आमच्या पंतप्रधानांना, परराष्ट्र मंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना, मुख्यमंत्र्यांना सल्ले देत होता. वाजपेयी साहेबांचे दाखले देत होता. पण जो बाळासाहेबांचे विचार विसरला आहे, त्यांची हमासविरोधी, दहशतवादाविरोधी भूमिका विसरला आहे, त्याने आम्हाला सल्ले देऊ नयेत, असं नितेश राणे यांनी राऊतांना बजावलं आहे.
हा नियतीचा खेळ आहे
ठाण्यामध्ये टेंभीनाक्यावर जो नवरात्रौत्सव साजरा होतो त्या ठिकाणी आज रश्मी ठाकरे दर्शनाला गेल्या होत्या. तर तिकडचा फॅन आणि कुलर कोणीतरी बंद केला म्हणून त्यांचा फार जळफळाट झाला, त्यांना चीड आली. तिथले अधिकारी त्यांना घाबरले. उद्धव ठाकरेंना मी आठवण करुन देईन की, २००४ मध्ये रंगशारदाला होणार्या शिवसेनेच्या मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे येणार होते, पण त्या ठिकाणी नारायण राणे साहेबांना बसायला देऊ नये म्हणून खुर्ची काढून टाकण्याचे आदेश तुमच्याकडून देण्यात आले होते. असाच प्रकार तुम्ही राज ठाकरे साहेबांसोबत देखील केला. त्यांची खुर्चीच स्टेजवरुन काढून टाकण्यात आली होती. आज तुमच्या बायकोवरही तशीच वेळ आली. त्यामुळे हा नियतीचा खेळ आहे. नियती बरोबर आपल्या पद्धतीने प्रत्येकाला उत्तर देते, असं नितेश राणे म्हणाले.